गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.९: जिल्ह्यात दारुबंदी असल्याने बनावट व विषारी दारुचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत असून, अनेक नागरिकांचे जीव जात आहेत. त्यामुळे येथील दारुबंदीची समीक्षा करावी, या मागणीचा पुनुरुच्चार आमदार डॉ.देवराव होळी यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
आठवडाभरापूर्वी एका वृत्तवाहिनीच्या लाईव्ह कार्यक्रमात आमदार डॉ.देवराव होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्याची मागणी केली होती. ५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या गडचिरोली येथील पत्रकार परिषदेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर एका बड्या वर्तमानपत्रातही आ.होळींच्या मागणीसंदर्भात बातमी प्रकाशित झाली. या दोन्ही बातम्यांनंतर राजकीय वर्तुळात वादळ उठल्यानंतर आज आ.होळी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
आ.डॉ.देवराव होळी म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात १९९३ मध्ये दारुबंदी करण्यात आली. परंतु अलिकडच्या काळात जिल्ह्यात बनावट व विषारी दारुची विक्री केली जात असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे जीव जात आहेत. अनेक महिला विधवा झाल्या आहेत. याबाबत आपण आमदार होताच विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, असे आ.डॉ.होळी यांनी सांगितले. जिल्ह्यातील दारुबंदी उठवा, असे आपण वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोललोच नाही. आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, दारुबंदीला आपला पूर्ण पाठिंबा आहे, असे आ.डॉ.होळी यांनी स्पष्ट केले.
मात्र दारुबंदीचा किती फायदा वा तोटा झाला, हे जनतेला कळणे आवश्यक असून, दारुबंदीची समीक्षा करण्यासाठी एका अभ्यासगटाची स्थापना करावी, अशी मागणी आ.डॉ.होळी यांनी केली. पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपचे शहराध्यक्ष सुधाकर यनगंधलवार, जिल्हा परिषद सदस्य प्रा.रमेश बारसागडे, भाजप नेते अनिल पोहनकर, नगरसेवक केशव निंबोड, जनार्धन साखरे, शंकर इंगळे उपस्थित होते.