गडचिरोली | --°C | --°C |
देसाईगंज, ता.३: शेतकरी, मजूर व ओबीसींच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी उपविभागीय कार्यालयावर धडक दिली.
शेतकऱ्यांची कर्जमाफी व ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी शिवसेनेने जिल्हाभर आंदोलन छेडले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात आज एसडीओ कार्यालयावर धडक देण्यात आली. एसडीओ विशालकुमार मेश्राम हे दौऱ्यावर असल्याने तहसीलदार कुमरे यांना निवेदन देण्यात आले. ज्या शेतकऱ्याचे नाव कर्जमाफीच्या यादीत आले; परंतु त्याचे प्रत्यक्षात कर्ज माफ झाले नाही, अशा प्रकरणांची चौकशी करुन संबंधितांना तत्काळ कर्जमाफीचे प्रमाणपत्र द्यावे, अनेक पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, त्यांचे सर्वेक्षण करुन कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, पीक कर्ज न देणाऱ्या बँकेवर कारवाई करावी, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, पात्र शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे वाटप करावे, घरगुती व कृषिपंपांना भरमसाठ वीजबिल देण्यात आले, त्याची चौकशी करुन बिल कमी करावे,जिल्हा निवड मंडळ स्थापन करुन बेरोजगारांना नोकरी द्यावी, गोरगरीब व पात्र नागरिकांचे नाव बीपीएल यादीत समाविष्ट करावे, डिमांड भरुनही ज्या शेतकऱ्यांना कृषिपंपाची जोडणी देण्यात आली नाही, त्यांना ती देण्यात यावी, उज्ज्वला योजनेंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांनाही गॅस कनेक्शन देण्यात यावे इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, भरत जोशी, अशोक धापोडकर, तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत बन्सोड, नंदू चावला, माजी जिल्हा परिषद सदस्य दिगंबर मेश्राम, विभागप्रमुख अशोक माडावा, शहरप्रमुख शंकर बेदरे, विकास प्रधान, प्रा.योगेश गोन्नाडे, प्रशांत किलनाके, महेंद्र मेश्राम, विठ्ठल ढोरे, विलास ठाकरे, राजू कांबळी, विजय बुल्ले, प्रदीप बगमारे, पुंजीराम मेश्राम, मधुकर सराटे, दिनेश मोहुर्ले, रमेश कुथे, रामेश्वर कांबळे, सूरज बन्सोड, कुंडलिक बन्सोड, एकनाथ वघारे, प्रवीण राऊत, रामचंद्र नाकतोडे, उज्जू मेश्राम, पुंडलिक धोटे, जगदीश कुथे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.