शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

अखेर गोंडवाना विद्यापीठाला मिळाला हक्काचा सातबारा

Friday, 29th June 2018 07:25:44 AM

गडचिरोली, ता.२९: नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून २७ सप्टेंबर २०११ रोजी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांकरिता स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून या विद्यापीठाला लागणाऱ्या जमिनीचा शोध सुरु होता. अखेर तब्बल ७ वर्षानंतर या विद्यापीठाच्या नावाने सातबारा होण्याचा मुहूर्त शुक्रवार २९ जून रोजी निघाला. यामुळे आता गोंडवाना विद्यापीठाची भव्य प्रशासकीय वास्तू व शैक्षणिक संकुल जिल्हा मुख्यालयापासून ४ किमी अंतरावर असलेल्या अडपल्ली येथे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गोंडवाना विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांनी विद्यापीठाच्या विकासाकरिता वनविभागाच्या ५०० एकर जमिनीची मागणी शासनाकडे केली होती. तत्कालीन शासनाने यासाठी होकारही दिला होता. मात्र, पुढे त्याचे काय झाले, हे कुणालाच समजले नाही. दरम्यानच्या काळात नवे कुलगुरु डॉ. नामदेव कल्याणकर यांनी वनविभागाच्याच चामोर्शी मार्गावरील सेमाना देवस्थान परिसरातील जमिनीसाठी अर्थ व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात नियोजन आराखडा तयार केला. परंतु हाही प्रयत्न फसला. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने कुलगुरू डॉ. कल्याणकर यांच्या पुढाकारात शहरालगत असलेल्या मूल मार्गावरील कोटगल, पुलखल, कनेरी, पारडी परिसरात जमिनीचा शोध घेतला. त्यानंतरही धानोरा मार्गावरील लांझेडा परिसरातही जमिनीचा शोध घेण्यात आला. येथेही पुरेशा प्रमाणात जमीन उपलब्ध होऊ शकली नाही. 

हे प्रयत्न करुन थकल्यानंतर गोगाव येथील मूळचे रहिवासी असलेले डॉ. राजाभाऊ मुनघाटे, शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक अरूण हरडे यांच्याशी कुलगुरू डॉ.  कल्याणकर यांनी व्यक्तीगत संपर्क साधून जमीन विद्यापीठाला देण्याची मागणी केली. जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमी पुढाकार घेणाऱ्या या दोन्ही व्यक्तींनी जमीन देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी अडपल्ली परिसरात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत; त्या सर्व शेतकऱ्यांशी वैयक्तिक संपर्क करून विद्यापीठाला जमीन देण्याची विनंती केली. यातील अनेक जण विद्याव्यासंगी असल्याने त्यांनी कुलगुरूंची विनंती मान्य करीत जमीन देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने नियोजन आराखडा तयार करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थ व नियोजन तथा वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सादर केला. दरम्यानच्या काळात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या जमिनीची पाहणी करून तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली व निधीही उपलब्ध करून दिला. 

विद्यापीठ प्रशासनाने अडपल्ली परिसरातील १९२ एकर जमिनीचे हस्तांतर करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. यापैकी पहिल्या टप्यात १०० एकर जमिनीची संपूर्ण कार्यवाही पार पाडण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरीत जमिनीची कार्यवाही करण्यात येणार आहे. 

शुक्रवार २९ जून रोजी डॉ. राजाभाऊ मुनघाटे, अनिल मुनघाटे, अनिकेत ठाकरे यांच्या जमिनीची विक्री प्रक्रिया पार पाडण्यात आली व त्याचे दप्तर विद्यापीठाकडे सोपविण्यात आले. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाला अखेर जमीन मिळाली असून, विद्यापीठाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
3RH0S
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना