गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१२: विधान परिषद निवडणुकीत विजयी झाल्यास गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती देऊ, अशी ग्वाही चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ.रामदास आंबटकर यांनी येथे दिली.
काल(ता.११)हॉटेल वैभव येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना डॉ.आंबटकर बोलत होते. यावेळी खा.अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, पक्षाचे नेते रवींद्र ओल्लालवार, नगरसेवक प्रमोद पिपरे, डॉ. भारत खटी, अनिल पोहनकर उपस्थित होते. डॉ.आंबटकर पुढे म्हणाले, आपण रातुम नागपूर विद्यापीठात १५ वर्षे सिनेट सदस्य म्हणून काम केले आहे. तेथे राहूनच गडचिरोलीत रातुम नागपूर विद्यापीठाचे उपकेंद्र व पुढे गोंडवाना विद्यापीठ व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्याला यशही आले. त्यावेळी उपकेंद्रासाठी २० एकर जागा मिळवून दिली. पुढेही या विद्यापीठाचा विकास करण्याचा मानस आहे. शिक्षणाशिवाय अन्य विकासाचे मुद्देही महत्वाचे आहेत. नगर परिषदा व नगर पंचायतींना भेडसावणाऱ्या समस्यांचा आपण पाठपुरावा करु. शासकीय योजना कार्यान्वित करुन जनतेला त्यांचा लाभ मिळवून देणे आणि मागास जिल्ह्याचा विकास करणे, हेच आपले ध्येय असल्याचे डॉ.आंबटकर म्हणाले.
विधान परिषद मतदारसंघात भाजपकडे मोठे संख्याबळ आहे. भाजपशिवाय अन्य पक्षातील चांगल्या लोकांना सोबत घेऊन आपण विकासाला प्राधान्य देऊ, असे सांगून डॉ.रामदास आंबटकर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचे आपल्यापुढे आव्हान नसले:तरी लढाई मात्र आहेच, अशी कबुली दिली. याप्रसंगी भाजयुमोचे नेते अविनाश महाजन, दिलीप म्हस्के उपस्थित होते.