गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२०: शहरी व ग्रामीण भागातील सामाजिक व आर्थिक दरी ज्ञानोपासनेच्या माध्यमातून दूर करणे ही विद्यापीठाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर यांनी केले.
आज येथे आयोजित गोंडवाना विद्यापीठाच्या ७ व्या दीक्षांत समारंभात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. सामाजिक व आर्थिक संपन्नता मिळवून देशाच्या विकासाकरिता विद्यार्थी, विद्यापीठ व समाजाने प्रयत्न करावे. मुगल व इंग्रजांच्या आगमनानंतर भारतातील प्राचीन सांस्कृतिक व औद्योगिक संपन्नतेचा ऱ्हास झाला. ती पोकळी भरुन काढणे हे देशापुढील आव्हान आहे. तंत्रज्ञानाचा निरंतर वापर झाल्यास हा ग्रामीण क्षेत्रात उदरनिर्वाहाच्या संधी निर्माण होऊ शकतात, असे डॉ.काकोडकर म्हणाले.
मंचावर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नामदेव कल्याणकर, प्र-कुलगुरु डॉ.चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले उपस्थित होते. या दीक्षांत समारंभात २१ जणांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. १५४४५ विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली, तर ३१ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर व प्रा.शिल्पा आठवले यांनी केले.