गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.११: मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि शासकीय खरेदी केंद्रावर आणलेले हजारो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे धान भिजून नुकसान झाले आहे. या आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय खरेदी दराने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भाई जराते यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावरील कर्मचारी आणि अधिकारी तसेच धान खरेदी संबंधातील शासकीय धोरणाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आणलेल्या धानाची महिनाभरापासून मोजणी आणि खरेदी करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसाने खरेदी केंद्रावरील धान भिजून हजारो शेतकरी कोट्यवधीने कंगाल झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे या गंभीर प्रकाराची दखल घेऊन खरेदी केंद्रावर आणलेल्या; पण मोजणीअभावी खरेदी न केलेल्या आणि आता अवकाळी पावसामुळे भिजून खराब झालेल्या संपूर्ण धानालाही शासकीय दराप्रमाणे शेतकऱ्यांना देयक अदा करून शासनाकडून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेकाप नेते भाई रामदास जराते यांनी केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा लावून धरणारःआ.जयंत पाटील
गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे खरेदी केंद्रावर भिजून हजारो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे धान खराब होण्याचा प्रकार गंभीर असून चुकीचे खरेदी धोरण बदलणे आणि खरेदीसाठी टाळाटाळ तसेच व्यापाऱ्यांचे धान खरेदी करून शेतकऱ्यांची गळचेपी करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी आणि खरेदी केंद्रावर भिजलेल्या धानाला शासकीय हमीदराने भरपाई मिळावी, यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा लावून धरणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी दिली आहे.