गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२८: देव, धर्म, व्रतवैकल्य इत्यादींच्या माध्यमातून बहुजन समाजाला गुलाम बनविण्याचे काम केले जात आहे. याच विरोधात महात्मा जोतिराव फुल्यांनी ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ लिहून समाजाला दिशा दिली. त्यामुळे समाजाला पेशवाईत ढकलणाऱ्या विचारांपासून परावृत्त होऊन् म.फुल्यांचे विचार अंगिकारावे, असे आवाहन सुप्रसिद्ध विचारवंत डॉ.समीर कदम यांनी आज येथे केले.
गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटनेच्या वतीने आज अभिनव लॉन येथे राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांचा स्मृतीदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
जिल्हा माळी समाज संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम निकोडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ येथील माळी समाज सेवा संघाचे संस्थापक दिलीप कोटरंगे, अकोला येथील सामाजिक कार्यकर्त्या मोनिका काळे, नागभिड येथील संजय येरणे उपस्थित होते.
डॉ.कदम पुढे म्हणाले, एकोणीसाव्या शतकाच्या मध्यात जोतिराव फुले हे सर्वाधिक कर भरणारे श्रीमंत व्यावसायिक होते. सुशिक्षित व श्रीमंत असूनही त्यांना एका उच्चवर्णीय मित्रांच्या लग्नाच्या वरातीतून अपमानित करुन हाकलण्यात आले. परंतु फुल्यांनी उच्चवर्णीयांच्या पेशवाईला भीक न घालता शुद्रातिशुद्रांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ लिहून त्यावेळचे उच्चवर्णीय लोक बहुजन समाजाचा कसा छळ करतात, याचे वास्तव मांडले. छत्रपती शिवरायांची समाधी शोधून त्यांचा पहिला दीर्घ पोवाडा लिहिणारे म.फुले हे थोर समाजसुधारक होते. या देशात डच, पोर्तुगीज व इंग्रज आले आणि निघूनही गेले. परंतु आर्य आले ते अद्यापही येथून गेले नाहीत. ते मानगुटीवर बसून असल्यानेच बहुजन समाजाची प्रगती खुंटली आहे, असे डॉ.समीर कदम यांनी सोदाहरण स्पष्ट केले.
जोतिराव फुल्यांनी हंटर आयोगापुढे शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याची मागणी केली. शिक्षणामुळेच प्रगतीची कवाडे खुली होतात, हे त्यांना ज्ञात होते. परंतु आता बहुजन समाजाचे विद्यार्थी शिकूच नयेत, अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. महिलांनी देवधर्मात गुरफटून राहू नये. वारंवार उपवास न करता सुदृढ आरोग्यासाठी चांगले व पोटभर अन्न खावे, असे सांगून डॉ.कदम यांनी प्रबोधन करणाऱ्या कार्यकर्त्याची अर्धांगिणी घरात अंधश्रद्धा व मनुवादी संस्कार पाळत असेल, तर त्या कार्यकर्त्याच्या प्रबोधनाला अर्थ उरणार नाही, असे परखडपणे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन वंदना गुरनुले(शेंडे), तर प्रास्ताविक अशोक मांदाडे यांनी केले. गुरुदास बोरुले यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला माळी समाज बांधवांसह सुधारणावादी नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.