गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१९: गडचिरोली विधानसभा क्षेत्रात शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार जयश्री वेळदा यांची विजयाकडे घोडदौड सुरु असून, मतविभाजन टाळण्यासाठी काँग्रेससह सर्व पुरोगामी पक्ष व संघटनांनी शेकापला पाठिंबा द्यावा,असे आवाहन शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
रामदास जराते म्हणाले की, गडचिरोली विधानसभा क्षेत्रात शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार जयश्री वेळदा ‘खटारा’ चिन्ह घेऊन रिंगणात आहेत. कालपर्यंत शेकापच्या उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु काँग्रेस पक्षाच्या उमेदवारापेक्षाही शेकाप उमेदवाराची स्थिती चांगली झाल्याने आता आम्ही दुसरा क्रमांक पार करुन विजयाच्या दिशेने घोडदौड करीत असल्याचा दावा श्री.जराते यांनी केला.
भाजप हा जातीयवादी व भांडवलवादी पक्ष असून, त्याच्या विरोधात लढताना मतविभाजन होऊ नये, याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे काँग्रेससह सर्व पुरोगामी पक्ष व संघटनांनी भाजपचा पराभव करण्यासाठी एकजुटीने शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीशी राहावे, असे आवाहन श्री.जराते यांनी केले. शेकापला काँग्रेस व भाजपच्या असंतुष्ट कार्यकर्त्यांचा छुपा पाठिंबा मिळत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
पत्रकार परिषदेला शेकापचे जिल्हा खजिनदार शामसुंदर उराडे, गडचिरोली विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम, चामोर्शी तालुका चिटणीस दिनेश चुधरी, जिल्हा समितीचे सदस्य भक्तदास कोठारे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा चिटणीस अक्षय कोसनकर, विजयानंद रोळे महाराज, दामोधर रोहनकर, प्रदीप आभारे उपस्थित होते.