गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२१ : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, विधानसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
शेखर सिंह यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर असून, ५ तारखेला छाननी होईल. ७ ऑक्टोबर ही नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. २१ ऑक्टोबरला मतदान व २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. या काळात ठिकठिकाणी लागलेले राजकीय बॅनर व पोस्टर्स काढून घेण्यात येतील. प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारची निविदा काढण्यात येणार नाही. आचारसंहितेचे उललंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असेही शेखर सिंह यांनी सांगितले.
जिल्ह्यात ४०५० मतदान कर्मचारी राहणार असून, त्यांचे प्रशिक्षण २६,२७ व २८ सप्टेंबरला आयोजित करण्यात आले आहे. हे कर्मचारी दुर्गम् भागातही काम करतात. त्यांचा भत्ता वाढवावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मतदान प्रक्रियेदरम्यान गैरहजर राहणाऱ्या व मद्य प्राशन करुन येणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही शेखर सिंह यांनी सांगितले. जिल्ह्यात २२३२ दिव्यांग मतदार असून, त्यांच्या मदतीसाठी राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी व युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांची मदत घेण्यात येणार असल्याची माहितीही श्री.सिंह यांनी दिली. पत्रकार परिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना नीळ उपस्थित होत्या.