गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१: शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व सामान्य माणसाच्या हिताचे राज्य निर्माण करण्याच्या हेतूने २ आँगस्ट १९४७ रोजी आळंदी येथे शंकरराव मोरे व केशवराव जेधे यांनी स्थापन केलेल्या भारतीय शेतकरी कामगार पक्षाला येत्या २ आँगस्ट रोजी ७२ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त चामोर्शी येथील नगरपंचायतीच्या सभागृहात वर्धापनदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार भाई राहुल पोकळे(पुणे) यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी मुंबई प्रदेश कार्यालयीन चिटणीस अँड. राजेंद्र कोरडे हे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भाई राहुल देशमुख, पुणे जिल्हा प्रवक्ता भाई उमेश शिंदे, नागपूर जिल्हा चिटणीस भाई मिलिंद कांबळे, जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, पीरिपाचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर, महिला नेत्या जयश्री वेळदा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला पक्षाच्या महिला, विद्यार्थी, सहकार आघाडीचे सर्व पदाधिकारी व पक्ष सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे गडचिरोली विधानसभा चिटणीस भाई नरेश मेश्राम, चामोर्शी तालुका चिटणीस भाई दिनेश चुधरी, गडचिरोली तालुका चिटणीस भाई सुधाकर आभारे, सचिन नैताम, रमेश चौखुंडे यांनी केले आहे.