गडचिरोली | --°C | --°C |
चामोर्शी,ता.२४: शेतकरी कामगार पक्षाने महाराष्ट्रात आजवर रस्त्यावर उतरून कष्टकरी कामगारांचे अनेक लढे यशस्वीपणे लढले आहेत. कष्टकऱ्यांच्या प्रश्नांबरोबरच शेकाप आता जिल्ह्यातील ओबीसींच्या हक्कासाठी रस्त्यावरची लढाई लढेल,असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केले.
तालुक्यातील खंडाळा येथील नवयुवक मंडळाद्वारा कार्तिक एकादशीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकापच्या महिला नेत्या जयश्री वेळदा,तर प्रमुख अतिथी म्हणून शेकापचे गडचिरोली विधानसभा चिटणीस भाई नरेश मेश्राम, पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा चिटणीस अक्षय कोसनकर, तालुका चिटणीस दिनेश चुधरी, प्रकाश सहारे, रमेश चौखुंडे, राजू केळझरकर, प्रदीप आभारे, माजी पं.स.सदस्य प्रमोद भगत, श्री.सेलोकर, भेंडाळाचे पोलिस पाटील श्रीरंग म्हशाखेत्री, घारगावचे पोलीस पाटील आभारे, गुरुदेव सातपुते, जानकीराम ढोबे, नरेश पोरटे, नोमाजी सातपुते, प्रमोद गोर्लावार, भैयाजी मंगर, बालाजी झोडक प्रामुख्याने उपस्थित होते.
भाई रामदास जराते पुढे म्हणाले की, ओबीसीच्या हक्कासाठीचे आंदोलन तीव्र करण्याची गरज असून, मोठ्या संख्येने तरुणांनी रस्त्यावर उतरावे, या संघर्षासाठी लागणारी राजकीय ताकद शेकाप पुरवेल, तसेच येणाऱ्या काळात विधिमंडळात जिल्ह्यातून ओबीसींचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडणुकीचे राजकारण करेल. यावेळी श्री.सेलोकर, प्रमोद भगत यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अरविंद उंदिरवाडे तर प्रास्ताविक गुरुदेव सातपुते यांनी केले.