गडचिरोली | --°C | --°C |
कुरखेडा,ता.१४: प्राकृतिक संसाधनांवर सर्वांचा संवैधानिक हक्क आहे. मात्र, त्यालाच डावलण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे संविधानाच्या रक्षणासाठी युवक, युवतींनी पुढे यावे, असे आवाहन ओरिसा येथील नियमगिरी आंदोलनाचे प्रणेते प्रफुल्ल सामंतरा यांनी येथे केले
जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समनव्याच्या वतीने २ आक्टोबरपासून दांडी(गुजरात) येथून सूरु करण्यात आलेली संविधान सन्मान यात्रा ११ राज्यांतून परिभ्रमण करीत काल(ता.१३) कूरखेडा येथे पोहचली. यावेळी येथील श्री. गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयात प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यानी यात्रेचे स्वागत केले.
त्यानंतर महाविद्यालयात आयोजित 'सुसंवाद तरुणाईशी' या कार्यक्रमात यात्रेचे मुख्य प्रवर्तक व 'प्रति नोबल पुरस्कार' समजण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय राईट लाईव्हलीहूड पुरस्कारप्राप्त ओडिसा येथील नियमगीरी आंदोलनाचे प्रणेते प्रफुल सामंतरा यानी तरुणाईशी संवाद साधला. ते म्हणाले, प्राकृतिक संसाधन असलेल्या जल, जगंल, जमीन व वायू यावर आपला संवैधानिक हक्क आहे. त्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. पृथ्वीवर मानवतेच्या रक्षणाकरिता ही गरज आहे. तरुणाईने या कामात पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यानी यावेळी केले.
पुणे येथील 'आंदोलन' या मासिकाच्या संपादिका सुनीता सु.र., गुजरात येथील पर्यावरण सुरक्षा समितीचे कार्यकर्ते तथा राष्ट्रीय जन आंदोलनाचे समन्वयक कृष्णकांत, सुहास कोल्हेकर, प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या यात्रेत देशातील विविध जनआंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संविधान सन्मान व रक्षणाची शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 'आम्ही आमच्या आरोग्यासाठी' या स्वंयसेवी संस्थेचे संचालक डॉ. सतीश गोगुलवार होते. संचालन व आभार प्रा. डॉ. नरेन्द्र आरेकर यानी केले.