गडचिरोली | --°C | --°C |
धानोरा, ता.१०: जीवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने शेतातील धानाची गंजी जळून राख झाली. ही घटना तालुक्यातील इरुपटोला येथे काल(ता.९) दुपारी घडली.
इरुपटोला येथील कालिदास चरणदास चौधरी यांची गावाला लागूनच शेती आहे. यावर्षी त्यांनी आपल्या शेतात धानाचे 'लक्ष्मी' या वाणाची पेरणी केली होती. नुकतेच त्यांनी धानाची कापणी करुन आपल्या शेतात ३०० भारे ठेवले होते. त्या शेतावरुनच ११ केव्ही व कृषिपंपाची विद्युत वाहिनी गेली आहे. दोन्ही वाहिन्यांच्या विद्युत तारा लोंबकळत आहेत. अशातच काल दुपारी ३ वाजताच्या सुमारास या तारांवर पक्षी बसल्याने दोन्ही बाजूंनी घर्षण होऊन धानाच्या गंजीला आग लागली. या आगीत संपूर्ण भारे जळून राख झाले. यामुळे चौधरी यांचे सुमारे २५ ते ३० क्विंटलचे नुकसान झाले. माहिती मिळताच पंचायत समिती सभापती अजमन रावटे, पंचायत समिती सदस्य विलास गावळे, पंचशिला चौधरी, मुकुंद कावळे, ग्रामसेवक सुदेश टिकले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आपद्ग्रस्त शेतकऱ्यास तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.