गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१९: कोट्यवधी रुपयांच्या राफेल विमान खरेदीत प्रचंड घोटाळा झाला असून, सरकार त्याची जबाबदारी का स्वीकारत नाही, असा सवाल करीत अ.भा.शेतकरी, शेतमजूर काँग्रेसचे अध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
येथील इंदिरा गांधी चौकातील सभागृहात आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या धरणे आंदोलनात श्री.पटोले बोलत होते. कार्यक्रमाला माजी खासदार मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, माजी आमदार आनंदराव गेडाम, काँग्रेसचे निरीक्षक सुरेश भोयर, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, डॉ.नामदेव किरसान, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, जिल्हा परिषद सदस्य अॅड.राम मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री.पटोले पुढे म्हणाले, राफेल विमानांची खरेदी करताना हिंदुस्थान एरोनॉटिक्स ही अनुभवी भारतीय कंपनी असताना व तिला कंत्राट झाले असताना अचानक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स या कंपनीला कंत्राट देण्यात आले. शिवाय सरकार नेमकी रक्कम किती खर्च झाली याचीही आकडेवारी सांगत नाही. याचा अर्थ राफेल खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप पटोले यांनी केला. मोदी सरकार आल्यापासून उद्योग देशोधडीला लागले आहेत. निरव मोदी, माल्या आदींनी सरकारच्या संमतीनेच घोटाळे करुन विदेशात पलायन केले. त्यांची विचारपूस करण्यासाठीच मोदी वारंवार विदेश दौऱ्यावर जातात, असा घणाघाती प्रहारही नाना पटोले यांनी केला. ज्या बोफोर्स तोफांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप भाजपवाले करीत होते; त्याच बोफोर्स तोफांनी कारगिल युद्ध जिंकून दिले. त्यानंतर या तोफांचे सर्वांनी कौतूक तर केलेच; शिवाय मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर न्यायालयाने बोफोर्स तोफा खरेदीत कुठलाही घोटाळा झाला नाही असा निवाडाही दिला, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
मोदी आणि फडणवीस सरकार दोघेही बहुजनांवर अन्याय करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात दररोज नवनवे जीआर काढून ओबीसी समाजावर अन्याय केला जात आहे. येथे उद्योग उभारण्याच्या नावाखाली काही विशिष्ट कंपन्यांना खैरात वाटली जात आहे, अशी टीका पटोले यांनी केली. यावेळी माजी आमदार नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, रवींद्र दरेकर यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन विनोद खोबे व प्रा.दौलत धुर्वे यांनी केले.
वडेट्टीवारांची दुसऱ्यांदा दांडी
नाना पटोले यांचे काँग्रेसमध्ये पुनरागमन झाल्यापासून पटोले आणि आ.विजय वडेट्टीवार यांच्यात फार चांगले संबंध असल्याचे दिसत नाही. १६ एप्रिल २०१८ रोजी काँग्रेसने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांचा मोर्चा काढला होता. त्यावेळी नाना पटोले यांनी गडचिरोलीत येऊन या मोर्चाचे नेतृत्व केले होते. परंतु त्यावेळी पक्षाचे विधिमंडळ उपनेते आ.विजय वडेट्टीवार गैरहजर राहिले होते. आज काँग्रेसच्या मेळाव्यासाठी श्री.पटोले दुसऱ्यांदा गडचिरोलीत आले. मात्र, वडेट्टीवार यांनी आजही आपली गैरहजेरी नोंदवली. यावरुन दोघांमध्ये मधूर संबंध नाहीत, अशी चर्चा होऊ लागली आहे.