गडचिरोली | --°C | --°C |
अहेरी,१०: मोटारसायकल नदीत कोसळल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल(ता.९) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास बोरीनजीकच्या दिना नदीच्या पुलावर घडली. सुभाष सुपदो मंडल(१९)रा.पाखांजूर(छत्तीसगड) व विशाल गौरंग मोदकर(२५)रा.शांतीग्राम, ता.मुलचेरा अशी मृत युवकांची नावे आहेत.
सुभाष मंडल व विशाल मोदकर हे काल आलापल्ली येथील पोळा पाहून एमएच ३४-व्ही ४३१७ क्रमांकाच्या मोटारसायकलने शांतीग्रामकडे जाण्यास निघाले. रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास नियंत्रण सुटल्याने दोघेही मोटारसायकलसह दिना नदीच्या पात्रात कोसळले. नदीतील दगडांवर आपटून दोघांचाही मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने ही घटना कुणालाही कळली नाही. आज सकाळी बोरी येथील काही नागरिक नदीवर गेले असता त्यांना नदीत एक मोटारसायकल व दोन युवकांचे मृतदेह आढळून आले. राजपूर पॅच गावच्या पोलिस पाटलाने अहेरी पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील, हवालदार दुगा, मौंदेकर, माने यांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह काढले.
दिना नदीच्या पुलाला कठडे नसून, पुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे दोन्ही युवकांना जीव गमवावा लागल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.