गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.३१: क्षुल्लक कारणावरुन झालेले भांडण विकोपाला गेल्याने एका इसमाने दुसऱ्याचा खून केल्याची घटना काल(ता.३०)रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास कोरची तालुक्यातील मोहगाव येथे घडली. अमरचंद जयराम वंजारी(५५)असे मृत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बलराम सिंगार यास अटक केली आहे.
काल रात्री अमरचंद वंजारी हे शेतावर असलेल्या आपल्या सासूला जेवणाचा डबा पोहोचवून परत येत होते. नरसिंग दुधकंवर यांच्या घराजवळ पोहचताच त्यांचे बलराम सिंगार याच्याशी क्षुल्लक कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले. यावेळी बलरामने अमरचंदच्या डोक्यावर विटेने प्रहार केला. रक्तबंबाळ अवस्थेत अमरचंद बेशुद्ध पडला. बलरामच्या वडिलाने अमरचंदच्या डोक्याला कापड बांधून अमरचंदच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर अमरचंदला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर अमरचंद पत्नी पुष्पाबाई व त्यांच्या कुटुंबीयांनी कोरची पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी रात्रीच आरोपीवर भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. कोरची पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गोरखनाथ दहिफळे घटनेचा तपास करीत आहेत.