गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२१: गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील नागरिक संततधार पावसाचा कहर बघत असताना आज पहाटे दोन युवकांनी मृत्यूच्या दाढेत अडकल्याचा अनुभव घेतला. मात्र, आपत्ती व्यवस्थापन, महसूल व पोलिस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या युवकांची सहिसलामत सुटका केली. गडचिरोलीपासून १० किलोमीटर अंतरावरील गुरवळा गावानजीक ही घटना अनेक नागरिकांनी बघितली.
त्याचे झाले असे की, गडचिरोली येथील निखिल सत्यनारायण चेरकरी(२७) व देवदत्त शरद धारणे(२६) हे दोन युवक आज भल्या पहाटे चारचाकी वाहनाने गुरवळा गावाकडे जात होते. मात्र, गावाच्या आधी शिवमंदिराच्या अलिकडे असलेल्या नाल्याला पूर आला होता. त्यातून वाट काढण्याचा प्रयत्न करताच कार वाहून जाऊ लागली. यावेळी दोघेही कसेबसे बाहेर निघाले. एक जण कारच्या छतावर चढला, तर दुसरा झाडावर चढला. सकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास माहिती मिळताच तहसीलदार डी.एस.भोयर, नायब तहसीलदार श्री.किरमे, दुरणकर, मडावी तसेच सहायक पोलिस निरीक्षक श्री.उदार, पोलिस उपनिरीक्षक श्री. सिसाळ, सहायक फौजदार सहारे, गौरकर, तिम्मलवार हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी ट्यूब व दोराच्या साह्याने दोन्ही युवकांना सुखरुप बाहेर काढले. मृत्यूच्या दाढेत अडकल्याचा थरार आणि त्यातून सुखरुप बाहेर निघाल्याचा सुखद अनुभव निखिल चेरकरी व देवदत्त धारणे या दोन्ही युवकांनी घेतला.
मात्र, हे युवक भल्या पहाटे गुरवळ्याकडे कशासाठी गेले होते आणि वाहनात काय होते,याविषयी पोलिसांकडून माहिती मिळाली नाही. त्या भागात काही जण नित्यनेमाने मध्यरात्री चारचाकी वाहनातून दारुचा पुरवठा करतात, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.