गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१६: रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आज गडचिरोली शहर जलमय झाले. शहरातील चामोर्शी मार्गावरील दोन्ही बाजूंच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. तिकडे भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीवरुन ३ फूट पाणी वाहू लागल्याने तालुक्यातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे.
आठवडाभरापासून जिल्ह्यात पाऊस पडत आहे. मात्र, काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत विक्रमी पाऊस पडला. गडचिरोली शहरात जिल्ह्यात सर्वाधिक २३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चामोर्शी मार्गावरील केमिस्ट भवनापासून ते राधे बिल्डिंगपर्यंतच्या रस्त्यावर तीन फूट पाणी होते. हे पाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या खोलगट भागातील घरांमध्ये शिरले. अनेकांची चारचाकी वाहने अंगणात व बाहेर उभी होती. पावसाचे पाणी शिरल्याने वाहने बंद पडल्याचे नागरिकांनी सांगितले. तब्बल नऊ वाजतापर्यंत पाणी असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे शक्य झाले नाही. संततधार पावसामुळे काही शाळांना आज सुटी देण्यात आली.
तिकडे भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीवरुन आज सकाळी साडेनऊ वाजतापर्यंत ३ फूट पाणी वाहत असल्याने त्या भागातील शंभर गावांचा संपर्क तुटला होता. परंतु दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास पाणी ओसरले. कुमरगुडा नाल्यावरुनही पाणी वाहत असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. चामोर्शी तालुक्यातील दिना नदी, कुरखेड्यातील सती नदी, गडचिरोलीनजीकची कठाणी नदी, पोटफोडी नदी व आरमोरीनजीकची गाढवी नदी व अन्य नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
गेल्या चोवीस तासांत गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक १८४.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल भामरागड तालुक्यात १०४ मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यात गडचिरोली शहरात सर्वाधिक २३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बामणी येथे २०५, तर पोर्ला येथे १८५ मिलिमीटर पाऊस पडला.