गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२४: गडचिरोली जिल्ह्यातील विविध दलममध्ये कार्यरत ३ जहाल नक्षल्यांनी नुकतेच गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. रजिता उर्फ सिरोती माधुराम कुरचामी(२६), जितेंद्र उर्फ परदेशी बाजीराव पदा(२१) व तिरुपती उर्फ पेंटा सुरा वेलादी(२०) अशी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजिता उर्फ सिरोंती माधुराम कुरचामी ही एप्रिल २०१० मध्ये टिप्पागड दलममध्ये भरती झाली. ऑगस्ट २०११ पासून २ञ१५ पर्यंत ती चातगाव दलममध्ये कार्यरत होती. ६ चकमकींमध्ये तिचा सहभाग होता. २ खून व एका जाळपोळीच्या घटनांचे गुन्हे तिच्यावर आहेत. शासनाने तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
जितेंद्र उर्फ परदेशी बाजीराव पदा हा जानेवारी २०१७ मध्ये टिप्पागड दलममध्ये भरती झाला. मार्च २०१८ पर्यंत तो तेथे कार्यरत होता. शासनाने त्याच्यावर २ लाखांचे बक्षीस ठेवले होते.
तिरुपती उर्फ पेंटा सुरा वेलादी हा जून २०१६ मध्ये अहेरी दलममध्ये भरती झाला. ऑक्टोबर २०१७ पासून मे २०१८ पर्यंत कंपनी क्रमांक १० चा सदस्य म्हणून तो कार्यरत होता. एका चकमकीत त्याचा सहभाग होता. शासनाने त्याच्यावर ४ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
या तिघांनीही पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. २०१७-१८ या वर्षात एक कंपनी सदस्य, एक एरिया कमिटी सदस्यासह विविध दलमच्या ३५ नक्षल्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग पत्करला. आत्मसमर्पित नक्षल्यांपासून प्रेरणा घेऊन दलममधील इतर सदस्यही नक्कीच आत्मसमर्पण करतील, असा विश्वास पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी व्यक्त केला आहे.