गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१७: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांमधील पात्रता निश्चित करण्यासाठी तालुकास्तरीय समित्या गठित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुकास्तरीय समिती आता अंतिमरित्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या निश्चित करणार असून, त्यानंतरच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. प्रलंबित प्रकरणांच्या याद्या बँक निहाय प्रसिध्द करण्यात येत आहेत.
राज्यात या महत्वाकांक्षी योजनेत सर्वाधिक शेतकऱ्यांना लाभ यापूर्वीच प्राप्त झाला आहे. मात्र, निकषांची पडताळणी न झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही योजनेचा लाभ मिळालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत २८ हजार ९८४ शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला आहे.
सहकारी संस्थांचे तालुका उपनिबंधक किंवा सहायक निबंधक हे समितीचे अध्यक्ष असतील. तसेच जिल्हा विशेष लेखापरीक्षक व सहकारी संस्थांच्या कर्ज प्रकरणांबाबत संस्थांचे लेखा परीक्षक सदस्य सचिव राहणार आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेचा त्या तालुक्याचा विकास अधिकारी व त्या तालुक्यांमधील असणाऱ्या बँकांचे शाखाधिकारी हे सदस्य असतील.
ज्या कारणास्तव प्रकरण प्रलंबित आहे, ती कागदपत्रे शेतकऱ्यांकडून प्राप्त करुन घेणे व त्या आधारे पात्र/अपात्र ठरविण्याबाबत अंतिम निर्णय घेणे आणि पात्र ठरलेला शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करणे आदी कामे ही समिती करेल. ही प्रक्रिया गतिमान पध्दतीने व्हावी यासाठी साप्ताहिक आढावा घेण्याचा निर्णयही झाला आहे. या तालुकास्तरीय समितीचे कामकाज व तपासणी गटाचे कामकाज यांची प्रगती संकलित करुन त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी अवगत करण्याची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांवर टाकण्यात आली आहे.
तालुका समितीतर्फे पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या अपलोड झालेला याद्यांवर महाऑनलाईन संगणकीय प्रक्रिया पूर्ण करुन ग्रीन लिस्ट तयार करण्याचे काम महाऑनलाईनला देण्यात आले आहे. या ग्रीन लिस्टनुसार पात्र शेतकऱ्यांच्या यादीप्रमाणे सहकार आयुक्त संबंधित बँकांना निधी वितरीत करतील. बँकेत निधी प्राप्त झाल्यावर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करुन या योजनेचा लाभ देणे व प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करणे हा अंतिम टप्पा बँकांचा राहणार आहे.
ऑनलाईन अर्ज सादर करुनही ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रकरणे प्रलंबित आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या कागदपत्रांसह जेथून कर्ज घेतले आहे, त्या बँकेच्या शाखाधिकाऱ्यांना भेटून आपल्या अर्जाच्या पात्रतेचे पुरावे सादर करावेत व या कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सीमा पांडे यांनी केले आहे.