गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१५ : गडचिरोली जिल्ह्यातील जंगलव्याप्त भागात आपल्या प्राणाची बाजी लावून नक्षल्यांशी लढणा-या ३ जवानांना राष्ट्रपती पोलिस पदक, तर २० जणांना पोलिस शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे. राज्याचे गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आऱ आऱ पाटील यांच्या हस्ते आज (ता. १५) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजिक प्रजासत्तादिनाच्या सोहळ्यात सर्व जणांना सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक प्राप्त करणाºयांमध्ये शहीद गोविंदा फरकाडे, विद्यमान पोलिस नाईक शागीर शेख, पंकज गोडसेलवार यांचा समावेश आहे. पोलिस शौर्य पदक मिळविणा-यांमध्ये शहीद पोलिस मुंंशी पुंगाटी, विद्यमान हवालदार शामनदास उईके, शिपाई सरजू वेलादी, व्यंकटेश मुंगीवार, वासुदेव मडावी, पवन अर्का, विजय सल्लम, रवीकुमार गंधम, सूर्यकांत आत्राम, पोलिस उपनिरीक्षक दिगांबर पाटील, शिपाई बानू हलामी, नागेश टेकाम, येशू तुलावी, पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाघ, नितीन बडगुजर, शिपाई नागेश टेकाम, भैयाजी कुळसंगे, पोलिस उपनिरीक्षक संभाजी गुरव, शिपाई भजनराव गावंडे व कुमारशहा उसेंडी यांचा समावेश आहे.
१२ एप्रिल २०१३ रोजी धानोरा तालुक्यातील सिंदेसूर येथे नक्षल्यांशी चकमक उडाली होती. या चकमकीत शिपाई गोविंद फरकाडे शहीद झाले. तसेच १९ जानेवारी २०१३ रोजी अहेरी तालुक्यातील गोविंदगाव येथील चकमकीत ६ नक्षल्यांना पोलिसांनी जीवाची बाजी लावून कंठस्नान घातले होते. कोरची तालुक्यातील गांगीन, हेटलकसा व धानोरा तालुक्यातील पावरवेल येथे प्रत्येकी १ नक्षली ठार झाला होता. अन्य २ नक्षल्यांना पकडण्यातही पोलिसांना यश आले होते. त्यांच्या या कामगिरीबद्दल ३ जवानांना राष्ट्रपती शौर्यपदक, तर २० जणांना पोलिस शौर्यपदक देऊन गौरविण्यात आले.
आज गृहमंत्री पाटील यांनी पदकप्राप्त शहीद जवानांचे कुटुंबीय तसेच विद्यमान जवान व अधिका-यांना सन्मानित केले. यावेळी जिल्हाधिकारी रणजितकुमार, मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता, पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम, पोलिस अधीक्षक संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते़