II नैसर्गिक आपदा II
पाऊस धो धो पडला
डोंगर तो धसला
भसा भस कोसळला
चिखल खाली वाहला II१II
गाढ होते सगळे
गाव ते हो झोपले
घास करुनी गावाचा
भूमीने तो गिळला II२II
माळीण गांव भूमीत
गेले कसे ते गाडले ?
फक्त नाव शिल्लक
सारे भूमीत संपले II३II
निसर्गाचा कोप हा
गावावर जाहला
शेकड्यावरी मृतांचा
आकडा तो पोचला II४II
किती रे तोडशील
वृक्ष झाडे संपदा ?
किती रे सोसशील
नैसर्गिक आपदा II५II
संसार होता थाटला
दैवाने हा उधळला
जीवनाचा डाव हा
क्षणात काही संपला II६II
महाभूताने क्षणात
कार्यभाग साधला
पाहुनी ते दृश्य सारे
जमाव सुन्न जाहला II७II
दुःखाचा रंग हा
आसमंती दाटला
जन सागर इथे हा
मदतीस धावला II८II
प्रगतीच्या ह्या भरात
माणूस का विसरतो ?
निसर्गास नित्य आपण
किती किती शोषतो II९II
माणसाचा जीव आज
किती क्षुद्र जाहला
मदतीचा आकडा तो
काही लाखात मोजला II१०II
लेखक / कवी - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९
Email ID - kharichavata@gmail.com