गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.४: जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जीणे कठीण झाले आहे. या महागाईला केंद्र सरकार जबाबदार असून, सरकारच्या विरोधात शुक्रवारी ५ ऑगस्टला काँग्रेस पक्षातर्फे गडचिरोली येथे दुपारी १२ वाजता जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
महेंद्र ब्राम्हणवाडे म्हणाले की, घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल आदींचे भाव वाढल्याने नागरिक आधीच त्रस्त असताना केंद्र सरकारने अनेक खाद्य पदार्थांवरही जीएसटी लावला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. एकीकडे बेरोजगारीमुळे युवक, युवतींमध्ये नैराश्य आहे. त्यातच त्यांना महागाईचे चटके सोसावे लागत आहेत. याविरोधात शुक्रवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती ब्राम्हणवाडे यांनी दिली.
काँग्रेस पक्षाने गोरगरिबांच्या प्रश्नांवर नेहमीच सरकारचे लक्ष वेधले आहे. परंतु झोपेचे सोंग घेऊन असलेले केंद्र सरकार प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. जे सरकारविरोधात बोलतात; त्यांच्यावर ईडीसारख्या यंत्रणा लावून कारवाई केली जात आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे. परंतु नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही भरपाई देण्यात आली नाही. असा आरोप करुन ब्राम्हणवाडे यांनी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली.
पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी डॉ.नामदेव किरसान, शहराध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस डॉ.चंदा कोडवते, डॉ.नितीन कोडवते, महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव भावना वानखेडे, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश चौधरी, तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे, सगुणा तलांडी, रोजगार व स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष दामदेव मंडलवार, अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, राकेश रत्नावार, शालिक पत्रे, मिलिंद खोब्रागडे उपस्थित होते.