गडचिरोली | --°C | --°C |
अहेरी, ता़ १७: अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड येथील दलित कुटुंबाच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ अहेरी येथे आज १७ नोव्हेंबरला उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला़ अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यांतून सुमारे ५ हजार नागरिकांनी या मोर्चात सहभागी होऊन जवखेड घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली़
आज दुपारी साडेबारा वाजता शंकरराव बेझलवार महाविद्यालयाच्या प्रांगणातून मोर्चास सुरुवात झाली़ मशिद चौक, बुद्ध विहार,राजे विश्वेश्वरराव महाराज चौक व देवलमरीमार्गे हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला़ तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले़ जवखेड हत्याकांडाची सीआयडी किंवा सीबीआयमार्फत चौकशी करावी, आरोपींना तत्काळ अटक करावी, या प्रकरणाची बाजू मांडण्यासाठी निष्णात वकिलाची नियुक्ती करून खटला जलदगती न्यायालयात चालवावा इत्यादी मागण्या मोर्चेकर्यांनी केल्या़ त्यानंतर तहसीलदारांनी कक्षाबाहेर येऊन मोर्चेकर्यांचे निवेदन स्वीकारले़ भिमराव जुनघरे, एकनाथ चांदेकर, सुखदेव दुर्योधन, प्राचार्य रतन दुर्गे, पुष्पा अलोणे, रमेश उईके, रघुनाथ तलांडे, महावीर अग्रवाल, प्रा़ विष्णू सोनोने, अॅड़ उदय गलबले, प्रा़ नागसेन मेश्राम आदींनी मोर्चेकर्यांना संबोधित केले़ सभेचे संचालन आनंद अलोणे, तर प्रास्ताविक प्रा़ किशोर बुरबुरे यांनी केले़ या मोर्चात प्रा़किशोर बुरबुरे, सुशीला भगत, पुष्पा अलोणे, जिल्हा परिषद सदस्य लैजा चालूरकर, एकनाथ चांदेकर, दुर्योधन, अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेहबूब अली, आलापल्लीचे सरपंच सतीश आत्राम यांच्यासह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ विशेष म्हणजे, आजच्या मोर्चात अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड व मुलचेरा तालुक्यातील नागरिक स्वखर्चाने मोठ्या संख्येने उपस्थित राहिले़ मोर्चा दीड किलोमीटर लांब होता, हे या मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले़ मोर्चाच्या आयोजनासाठी ज्ञान प्रसारक युवक मंडळ, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, नागसेन बुद्ध विहार समिती, ज्ञानज्योती बुद्ध विहार समिती व विविध समाजमंडळांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले़