गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.६: अतिवृ्ष्टीमुळे आलेल्या पुरात दोन नागरिक वाहून गेले आहेत,तर ठाणेगाव येथील २५, चामोर्शी येथील १६ व अरततोंडी येथील शंभर जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू व पोलिसांना यश आले आहे.
धानोरा तालुक्यातील निमगाव येथील रामदास मादगू उसेंडी आरमोरी तालुक्यातील मेंढा येथील नाल्याच्या पुरात आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास वाहून गेला, तर चामोर्शी तालुक्यातील पाविलसनपेठा येथील सुधाकर पोटावी हा इसम पोरनदीत वाहून गेल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील २५ नागरिक पुरात अडकले होते. तसेच चामोर्शी माल येथील पुरात अडकलेल्या १६ जणांना आपत्ती व्यवस्थापन विभाग व पोलिसांनी बोटीद्वारे सुरक्षितरित्या बाहेर काढले. हे सर्व जण छत्तीसगड राज्यातील पाखांजूर व दुर्ग तालुक्यातील येथील रहिवासी आहेत.
कुरखेडा तालुक्यातील जुनी अरततोंडी येथील शंभर नागरिकांना सकाळी सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले, तर अन्य शंभर जणांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
गोसेखुर्द धरणाचे १९दरवाजे दीडमीटरने, तर १४ दरवाजे १ मीटरनेउघडण्यात आले असून, त्यातून ९२३४क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा पूर परिस्थिती भयावह होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील तब्बल १७ मार्ग बंद असल्याने हजारो गावांचा संपर्क तुटला आहे.