गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.३: अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे उन्हाळी धानपिकावर रोगराईचा प्रादुर्भाव झाला असून, शेतकरी संकटात सापडला आहे.
तालुक्यातील पोर्ला, नगरी व वसा परिसरातील शेतात काही प्रमाणात सिंचनाची व्यवस्था झाल्यामुळे यंदाच्या रबी हंगामात शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. मात्र, वातावरणात झालेल्या बदलामुळे उन्हाळी धान पिकावर रोगाचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करीत आहेत. दोनदा औषधाची फवारणी झाली असून, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. कृषी सहायकांकडून याबाबत शेतकऱ्यांना काही मार्गदर्शन लाभत नाही. कृषी सहायक शेतावर जाऊन कधीच पाहणी करीत नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. परिणामी शेतकऱ्यांना फवारणीच्या खर्चामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.