गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२: वनरक्षक पदांच्या भरतीत प्राधान्य देऊन सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी अनेक अनुकंपाधारकांनी कालपासून(ता.१) येथील प्रादेशिक मुख्य वनसरंक्षक कार्यालयापुढे आमरण उपोषण आरंभिले आहे. दरम्यान आज खा.अशोक नेते यांनी उपोषणमंडपाला भेट देऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यंदा राज्य शासनाने नॉन पेसा विभागात २३ वनरक्षक पदांची भरती घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदतही संपली आहे. परंतु वनविभागाने त्यात अनुकंपाधारकांना प्राधान्य दिले नाही. सामान्य प्रशासन विभागाच्या ३ मे २०१७ च्या परिपत्रकानुसार रिक्त पदांच्या १० टक्के पदे अनुकंपाधारकांमधून भरावयाची आहेत. तसेच १५ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार, १० टक्क्यांमध्ये वाढ करुन २० टक्के पदे अनुकंपाधारकांमधून भरावी, असे निर्देशित करण्यात आले आहे. परंतु वनविभागाने या शासन निर्णयांना 'खो' दिल्याचा आरोप अनुकंपाधारकांनी केला आहे.
२०१४ मध्ये वनविभागाने मेगा भरती केली होती. त्यात २३ अनुकंपाधारकांना सेवेत सामावून घेण्यात आले होते. परंतु नंतर झालेल्या भरतीत अनुकंपाधारकांना प्राधान्य देण्यात आले नाही. त्यामुळे अनुकंपाधारकांची प्रतीक्षा यादी वाढत आहे. आजमितीस या यादीत १४५ अनुकंपाधारक आहेत. त्यांना नोकरी मिळण्याची अंतिम वयोमर्यादा ४५ आहे. मात्र, प्रतीक्षा यादीतील अनेक जणांनी वयाची पस्तीशी ओलांडली आहे. काहींनी चाळीशीही गाठली आहे. त्यामुळे १० टक्के भरती केली नाही तर अनेक जणांना नोकरीपासून मुकावे लागणार असल्याने अनुकंपाधारक भयग्रस्त झाले आहेत.
अनुकंपाधारकांना नोकरभरतीत प्राधान्याने सामावून घ्यावे, ज्येष्ठता यादीतील वाढती संख्या लक्षात घेता अनुकंपाधारकांना विनाअट सेवेत सामावून घ्यावे, वयोमर्यादा ओलांडलेल्या अनुकंपाधारकाच्या पाल्याचे नाव अनुकंपा यादीत समाविष्ट करावे, अशा मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत. दरम्यान आज दुसऱ्या दिवशीही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची तपासणी केलेली नाही.
खा.अशोक नेते यांनी केली वनाधिकाऱ्यांशी चर्चा
अनुकंपाधारक उपोषणाला बसल्याची माहिती मिळताच खा.अशोक नेते यांनी आज सकाळी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी खा.नेते यांनी उपवनसंरक्षक श्री.कुमारस्वामी व अन्य अधिकाऱ्यांना बोलावून अनुकंपाधारकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले. नोकरभरतीत अनुकंपाधारकांना प्राधान्य द्यावे व वयाची अट शिथिल करावी, यासाठी आपण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बोलणार असल्याचे आश्वासन खा.नेते यांनी उपोषणकर्त्यांना दिले. याप्रसंगी भाजप नेते रवींद्र ओल्लालवार, जावेद अली उपस्थित होते.