गडचिरोली | --°C | --°C |
कुरखेडा, ता.१२: गांधी ही एक व्यक्ती नसून, विचार आहे. समाजात त्यांच्याविषयी पराकोटीचा अप्रचार करीत द्वेष पसरविण्यात आला. त्यांचे विचार व जीवनशैलीची टिंगलटवाळी करण्यात आली. मात्र, त्यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत. जगाच्या कल्याणाकरिता त्यांची गरज आहे. गांधी विचार मजबुरीचे नव्हे; तर सामर्थ्याचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेड़े यानी केले.
श्री. गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयात आज आयोजित वार्षिक सांस्कृतिक, कला महोत्सवाचे उदघाटन श्री. वानखेड़े यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी समाजसेवक व 'आम्ही आमच्या आरोग्यासाठी' या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश गोगुलवार, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे, कला शाखेचे उपप्राचार्य प्रा.पी एस खोपे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ.अभय साळुंखे, माया वानखेड़े उपस्थित होते.
चंद्रकांत वानखेड़े पुढे म्हणाले, एका विशिष्ट विचारसरणीने गांधींविषयी द्वेष पसरवीत त्यांची हत्या केली. मात्र, त्यांच्या हत्येनंतरही गांधी विचार संपुष्टात आला नाही. विसाव्या शतकातील जागतिक महापुरुषांच्या यादीत त्यांचे नाव अग्रक्रमाने आहे. १४६ देशांत त्यांचे पुतळे आहेत, १६७ देशांत त्यांच्या नावावर टपाल तिकिटे काढण्यात आली. गांधी या व्यक्तीची हत्या करण्यात आली, तरी त्यांचे विचार अजरामर आहेत. ते मिटविणे शक्य नाही. जगाचा कल्याणाकरिता त्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या 'मृदूगंध' या वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच 'गांधी विचार' स्पर्धेत यशस्वी कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्याचा स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.डॉ.नरेन्द्र आरेकर, संचालन मयुरी मेश्राम, तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.गुणवंत वडपल्लीवार यानी केले.