शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

संगणकशास्त्राची 'लक्ष्मणरेषा' ओलांडून त्याने काळ्या मातीत शोधले आपले भवितव्य!

Tuesday, 4th December 2018 12:08:27 AM

गडचिरोली, ता.४: बहुतांश जण नोकरी मिळेल, याच आशेने शिक्षण घेत असतात; नव्हे शिक्षण पूर्ण होताच त्यांची त्यासाठी धडपडही सुरु होते. परंतु संगणकशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या एका युवकाने आपल्या शिक्षणाची लक्ष्मणरेषा ओलांडून काळ्या मातीत आपले भवितव्य शोधले आहे. 

लक्ष्मण राजबाबू पेदापल्ली, असे या युवकाचे नाव असून, तो सिरोंचा तालुक्यातील रहिवासी आहे. लक्ष्मणने शुगर फ्री व ब्लॅक राईसच्या माध्यमातून हरितक्रांती घडवून यशस्वी शेतकरी होण्याचा मान पटकाविला आहे. 

लक्ष्मण नागपूर येथे संगणकशास्त्रात पदव्युत्तर प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता.तसाही संगणकशास्त्र आणि शेती यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. परंतु त्याने अचानक गावात येऊन यशस्वी शेतकरी होण्यासाठी प्रयत्न सुरू केला. ब्लॅक राईसचे उत्पादन मणीपूर राज्यात होत असून, या राईसचे अनेक फायदे असल्याचे त्याच्या वाचनात आले. त्यानंतर त्याने मागील वर्षी मणीपूर गाठले व तेथून दोन किलो ब्लॅक राईस आणून त्याची शेतात एक-एक दाणा रोवून लागवड केली. वैशिष्ट्य म्हणजे, ९० दिवसांत त्याला पीक प्राप्त झाले. एका धानाच्या रोपाला ४३.७५ ग्रॅम उत्पादन येऊन प्रति हेक्टरी ७२.३५ किलो ब्लॅक राईस मिळाले. 

या ब्लॅक राईसच्या विक्रीमुळे त्याला मोठा फायदा झाला. विशेष म्हणजे, हे ब्लॅक राईस ऑनलाईन पद्धतीने ५०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे विकले जात असल्याचे लक्ष्मणने सांगितले. त्र्यंबकेश्वर येथील पाराशर ऋषी यांना शंकराच्या भक्तीने सकाळी धान पेरल्यास संध्याकाळी पीक हातात मिळण्याचे वरदान प्राप्त झाले होते, अशी आख्यायिका आहे. या आख्यायिकेप्रमाणे त्याने  ब्लॅक राईस ९० दिवसांपेक्षा कमी अवधीत निर्माण करण्याचे स्वप्न तिसऱ्या खेपेला पूर्ण केले असून, आता ६० दिवसांत व दिवसेंदिवस कमी कालावधीत उत्पादन घेण्याचा मानस व्यक्त केला आहे. याचबरोबर सध्या अनेक व्यक्तींना मधुमेहाच्या आजाराने त्रस्त केले आहे. विशेष म्हणजे, पूर्व विदर्भातील तीन, चार जिल्ह्यांमध्ये भात खाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मधुमेह हा आजार भाताचा अधिक प्रमाणात आहारात वापर झाल्याने होत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे लक्ष्मणने शुगर फ्री राईस (आरएनआर)ची निर्मिती केली असून, हा तांदूळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार आहे. 

लक्ष्मणच्या मते, धकाधकीच्या काळात माणसाचे आयुष्य कमी होत असून, खाद्यपदार्थात रसायनाचा वापर होत असल्याने प्रत्येक घरात कॅन्सरचे रुग्ण यापुढे दिसू शकतात. त्यामुळे सेंद्रीय तांदूळ वापरणे काळाची गरज आहे. यासाठी जनतेत जागृती निर्माण करण्याची आवश्यकता त्याने विशद केली. युवक, युवतींनी लक्ष्मणपासून प्रेरणा घेतली, तर बेरोजगारीचा प्रश्न निश्चितपणे सुटू शकतो, असा विश्वास कृषिविषयक जाणकारांना वाटत आहे.

लक्ष्मणला मिळाली जीवनसाथी...

आजकाल बेरोजगार व शेतकरी तरुणांना मुलगी देण्यासाठी वधू पिता तयार होत नाही. मात्र, लक्ष्मणने संगणकशास्त्रातील पदव्युत्तर प्रथम वर्षाचे शिक्षण घेतले असून, शुगर फ्री व ब्लॅक राईसच्या माध्यमातून त्याने आपली आर्थिक उन्नती केली असल्याने लक्ष्मणला जीवनसाथी मिळाली आहे. याच महिन्यात त्याचा विवाहदेखील उरकणार आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
AR42W
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना