गडचिरोली | --°C | --°C |
चामोर्शी, ता.१२: प्रस्थापित राजकीय पक्षांकडून जिल्ह्यातील युवकांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. युवकांच्या हाताला रोजगार नसल्याने आणि त्यांच्या कौशल्यालाही किंमत नसल्याने ते निराश आहेत. त्यामुळे रोजगारासोबतच कला व क्रीडा गुणांच्या विकासासाठी शेतकरी कामगार पक्षाचे संघटन युवकांनी मजबुत करावे, असे आवाहन शेकापच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी केले.
घारगाव येथील नवयुवक भाद्रपद गणेश मंडळाच्या वतीने आयोजित प्रौढांच्या कबड्डी क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घारगावच्या सरपंच सुषमा आभारे, तर प्रमुख पाहुणे म्हणून शेकापचे जिल्हा सहचिटणीस वसंत गावतुरे, विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम, पुरोगामी महिला संघटनेच्या जिल्हा चिटणीस अर्चना चुधरी, पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा चिटणीस अक्षय कोसनकर, तालुका चिटणीस दिनेश चुधरी, प्रदीप आभारे, दामोधर रोहनकर, रमेश चौखुंडे, उपसरपंच नामदेव झलके, मंडळाचे अध्यक्ष संदीप आभारे, सचिव व्यंकटेश बोरकुटे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी हरांबा विरुद्ध पोटेगाव संघात झालेल्या उद्घाटनीय सामन्यात पोटेगाव संघाने २५ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नवयुवक भाद्रपद गणेश मंडळाचे कार्यकर्ते निलोज धोटे, पत्रू आभारे, नलेश ठाकरे, आकाश झोडक, प्रवीण भगत, संदीप ठाकरे, तोताजी भगत, संदीप बोरकुटे, निकेश भगत, किशन कोहपरे, लीलानाथ कोहपरे, धनराज काटवले, मंगेश आभारे, प्रफुल्ल लाटकर, रूपेश तुमडे, शरद मंगर, विजय आभारे, छबिलदास बोरकुटे यांनी सहकार्य केले.