गडचिरोली | --°C | --°C |
मुलचेरा, ता.८: बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर व गोरगरीब जनतेच्या विविध मागण्यांसाठी, तसेच वाढत्या महागाईच्या विरोधात आज येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधिमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार, माजी खासदार मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. शहीद वीर बाबूराव शेडमाके सभागृहापासून मोर्चास प्रारंभ झाला.
विजेचे वाढते दर कमी करावे, तसेच रिडिंग न करता देण्यात येणाऱ्या वीज बिलात दुरुस्ती करावी, कृषिपंपाचे वीज बिल माफ करावे, पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ थांबवून दर कमी करावे, मुलचेरा तालुक्यात नेहमी वीज खंडित होत असल्यामुळे तालुक्यातील प्रत्येक कुटुंबास २ लीटर याप्रमाणे केरोसीन देण्यात यावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी आ.विजय वडेट्टीवार, डॉ.नामदेव उसेंडी यांनी मोदी व फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. या सरकारांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत दोन्ही सरकारांना सत्तेवरुन खाली खेचा, असे आवाहन वडेट्टीवार व उसेंडी यांनी केले.
यावेळी काँग्रेसचे निरीक्षक सुरेश भोयर, युवा नेते डॉ.नितीन कोडवते, जिल्हा परिषद सदस्य अॅड.राम मेश्राम, हसनअली गिलानी, महेंद्र ब्राम्हणवाडे, सगुणा तलांडी, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र शहा, पंचायत समिती सभापती सुवर्णा येमुलवार, एटापल्लीचे तालुकाध्यक्ष संजय चरडुके, जि.प.सदस्य रुपाली पंदिलवार, शंकर हलदर, दादाजी सिडाम, अहेरी तालुकाध्यक्ष मुश्ताक हकीम, यांच्यासह तालुक्यातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.