गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१६: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने देशवासीय एका महान व्यक्तिमत्वाला मुकल्याची शोकसंवेदना जिल्ह्यातील विविध पक्षाच्या मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
खा.अशोक नेते: अटलजी हे देशाचे अनमोल रत्न होते. सामान्य कार्यकर्ता ते पंतप्रधान असा प्रवास करताना त्यांनी देशाला मोठे योगदान दिले आहे. ते जनसामान्यांचे नेते होते. अटलजी पंतप्रधान असताना मी त्यांना वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गासाठी भेटलो होतो. तेव्हा त्यांनी त्यास तत्काळ प्रतिसाद दिला होता. त्यांच्या निधनाने देशाने एक प्रभावी व्यक्तिमत्व गमावले आहे.
आ.क्रिष्णा गजबे: अटलजींच्या निधनाने देशाचा आधारस्तंभ हरपला आहे. देशाच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोठे आहे. एक उत्कृष्ट संसदपटू, प्रखर देशभक्त व प्रभावी वक्ता देशाने गमावला आहे. विरोधी पक्षाच्या मंडळींनाही आदरणीय वाटणाऱ्या अटलजींच्या निधनामुळे देशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
डॉ.नामदेव उसेंडी, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी: अटलजींच्या निधनाने देश एका ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्वाला मुकला आहे. भाजप हा कट्टरपंथीय पक्ष असतानादेखील अटलजींनी स्वत: धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केला. त्यामुळे विरोधी पक्षातील मंडळींनाही ते हवेहवेसे वाटत होते. राजधर्म पाळण्याची शिकवण देणारा महान नेता देशाने गमावल्याचे दु:ख आहे.
सुरेश सावकार पोरेड्डीवार, माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस: विरोधी पक्षनेते ते पंतप्रधान अशी पदे भूषविणाऱ्या अटलजींनी आपल्या कतृत्वाने देशवासीयांवर एक वेगळी छाप सोडली आहे. सत्तेत असताना विरोधकांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्व म्हणून अटलजींना ओळखले जाते. त्यांच्या निधनाने एक प्रभावी व लोभस व्यक्तिमत्वाचा अंत झाला आहे.
बाबूराव कोहळे, ज्येष्ठ नेते भाजप: अटलजी हे एक विचारवंत, प्रभावी वक्ते व महान राजकारणी होते. १९८४ व १९९५ अशा दोन वेळा ते गडचिरोलीत आले होते. त्यावेळी त्यांची सेवा करण्याचे भाग्य आपणास लाभले. देशाने एक देशभक्त व थोर नेता गमावला आहे.