गडचिरोली | --°C | --°C |
सिरोंचा,ता.२६: तालुक्यातील पोचमपल्ली ग्रामपंचायतींतर्गत कोत्तापल्ली येथील मुख्य रस्त्याच्या नाल्यावरील रपटा मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याने रहदारी ठप्प झाली असून, नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र, रपटा वाहून जाण्याला पंधरा दिवस होऊनही प्रशासनाने तो दुरुस्त न केल्याने नागरिक संतापले आहेत.
काही वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेंतर्गत कोत्तापल्ली गावापर्यंत डांबरीकरण करण्यात आले. शिवाय रस्त्यावरील नाल्यावर रपटाही बांधण्यात आला. परंतु पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या मुसळधार पावसामुळे रपटा वाहून गेला. त्यामुळे नागरिकांचे आवागमन ठप्प झाले आहे.
कोत्तापल्ली गावातील नागरिकांना ५ किलोमीटर अंतरावरील वडधम येथील स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणावे लागते. परंतु रस्ताच बंद झाल्याने कोत्तापल्ली गावातील दारिद्र्य रेषेखालील लोकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणणे अडचणीचे ठरत आहे. रस्ता बंद असल्याने नागरिकांना पायपीट करीत वडधमपर्यंत जावे लागत आहे .
सिरोंचा मुख्यालयाशीसुद्धा या परिसरातील गावांचा संपर्क तुटलेला आहे. या घटनेला पंधरा दिवस लोटूनही प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळे नागरिक संतापले असून, रपट्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.