गडचिरोली | --°C | --°C |
कोरची, ता.१४: वारंवार निवेदने देऊनही वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्रस्त्ा झालेल्या कोटगूल परिसरातील नागरिकांनी आज कोटगूल येथे सकाळी ६ वाजतापासून तब्बल ९ तास चक्काजाम आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले.
कोटगूल हे गाव तालुका मुख्यालयापासुन ३५ किलोमीटर अंतरावर आहे. परंतु परिसरात मागील तीन महिन्यांपासून सतत अनियमित विद्युत पुरवठा होत असल्याने नागरिकांनी महावितरणला अनेकदा निवेदने दिली. मात्र, महावितरण कंपनी समस्या सोडवण्याबाबत कानाडोळा करीत होती. त्यामुळे कोटगूल परिसरातील सुमारे ४० गावांतील नागरिकांनी आज कोटगूल येथे सकाळी ६ वाजतापासून कोटगूल-मुरुमगाव व कोटगूल-कोरची मार्गावर चक्काजाम आंदोलन केले. दुपारी ३ वाजतापर्यंत हे आंदोलन सुरु होते. ७ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच शेकडो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
कोटगूल येथील मंजूर ३३ केव्ही सबसेंटर सुरु करावे, सौभाग्य योजने अंतर्गत प्रत्येकाच्या घरी विद्युत पुरठा करावा, रिडींग न करता बिल पाठवणे बंद करावे, शेतकऱ्यांना कृषिपंप देऊन मीटर लावावे, विद्युत ट्रान्सफार्मर तसेच सात ग्रामपंचायतींमधील गावांमध्ये वाढीव खांब उभारावे, टिपागड देवस्थानात वीजजोडणी करून वीजपुरवठा करावा इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
जि.प.सदस्या सुमित्रा लोहंबरे, पंचायत समिती उपसभापती श्रावणकुमार मातलाम, सरपंच राजेश नैताम, सरपंच नरपतसिंग नैताम, सरपंच गिरजाबाई कोरेटी, प्रेमसिंग हलामी, माजी पंचायत समिती सदस्य रामदास हारामी, माजी पंचायत समिती सदस्य गुलाबसिंग कोडाप यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महावितरणचे धानोरा येथील उपविभागीय अभियंता मिलिंद गाडगिळ, कोरचीच्या नायब तहसीलदार रेखा बोके, नायब तहसीलदार नारनवरे उपस्थित होते. श्री.गाडगिळ यांनी विजेची समस्या दहा दिवसांत दूर करु, असे लेखी आश्वासन दिले. परंतु आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळेयेत्या बुधवारी १८ जुलै २०१८ रोजी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना कोटगूल येथे आणून समस्या सोडवू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. याप्रसंगी पोलिस मदत केंद्राच्या पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.