गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२: नक्षलवादी करीत असलेल्या हिंसेला विरोध करण्यासाठी भूमकाल संघटनेने 'मिस्ड कॉल' अभियान राबविण्यास आरंभ केल्याची माहिती संघटनेचे प्रमुख प्रा.अरविंद सोवनी व सचिव प्रा.श्रीकांत भोवते यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
प्रा.अरविंद सोवनी यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवादी निरपराध नागरिकांची हत्या करीत आले आहेत. त्यांनी शासकीय व खासगी मालमत्तेचे नुकसान केले आहे. शिवाय विकासकामांनाही ते विरोध करीत आले आहेत. परंतु दहशतीमुळे सामान्य नागरिक नक्षल्यांचा जाहीरपणे विरोध करण्यास धजावत नाही. त्यामुळे भूमकाल संघटनेने आता नक्षल्यांना विरोध करण्यासाठी 'मिस्ड कॉल' अभियान सुरु केले आहे. 'मिस्ड कॉल' करणाऱ्यांची माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात येणार आहे. नक्षली हिंसेला विरोध करण्यासाठी नागरिकांनी ८४१२९८८८४४ या क्रमांकावर 'मिस्ड कॉल' द्यावा, असे आवाहन प्रा.सोवनी यांनी केले.
नक्षलवाद संपविण्यासाठी प्रचंड प्रमाणात नक्षल्यांचे आत्मसमर्पण होणे गरजेचे आहे. भूमकाल संघटना आत्मसमर्पित नक्षल्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याची माहितीही प्रा.सोवनी यांनी दिली.