गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१:मागील दोन वर्षात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांसह इतर नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून,अनेकांना त्यातून सावरणे शक्य झाले नाही. त्यामुळे या पुराचे सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम काय होतात, हे जाणून शासनाकडे समस्या निवारणासाठी पाठपुरावा करण्याच्या हेतूने विदर्भ पूर आयोगाचे अध्यक्ष तथा प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले सोमवारी (ता.५) गडचिरोलीत येणार आहेत.
महाराष्ट्र किसान सभेने विदर्भ पूर आयोग गठित केला असून, त्यात पर्यावरण तज्ज्ञ मनिष राजनकर (भंडारा), जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे (पुणे), ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर कोंडबत्तूनवार ( नागपूर), फिड’चे संचालक कौस्तुभ पांढरीपांडे ( यवतमाळ), प्रा.डॉ.गुणवंत वडपल्लीवार यांचा समावेश आहे. हे सर्वजण डॉ.खांदेवाले यांच्यासमवेत उपस्थित राहणार आहेत. सोमवारी दुपारी ३ ते ५ वाजताच्या दरम्यान सर्कीट हाऊस येथे जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी, नागरिक, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, पत्रकार आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची मते ते जाणून घेणार आहेत.
या आयोगापुढे गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, पत्रकार व नागरिकांनी आपल्या समस्या लेखी व तोंडी स्वरुपात मांडाव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष डॉ.महेश कोपुलवार, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. देवराव चवळे, ॲड. जगदीश मेश्राम, बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार, शेकापचे हेमंत डोर्लीकर, कैलास शर्मा, प्रतीक डांगे, पुरुषोत्तम रामटेके यांनी केले आहे.