गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२९:शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील यांनी २५ नोव्हेंबरला गडचिरोली तालुक्यातील काटली शाळेला भेट दिली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे ज्ञान, त्यांचा नीटनिटकेपणा, शिस्त, शाळेतील स्वच्छता आणि शिक्षकांचे कौशल्य बघून आ.पाटील भारावून गेले.
२६ व २७ नोव्हेंबरला शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य मध्यवर्ती समितीची बैठक गडचिरोलीत आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी पक्षाचे सरचिटणीस आ.जयंत पाटील हे येणार असल्याचे कळताच काटली येथील गावकऱ्यांनी त्यांना गावात येऊन आपल्या समस्या ऐकून घेण्याचे निमंत्रण दिले. त्यास होकार देत नागपूरहून येता-येताच त्यांनी काटली गाव गाठले. तेथे पोहचताच शाळेतील विद्यार्थी, शिक्षिका आणि गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून इंग्रजीतून काही प्रश्नही विचारले. विद्यार्थ्यांनी त्यांची अचूक उत्तरे दिली. यामुळे प्रभावीत होऊन आ.पाटील यांनी विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे ज्ञान, त्यांची शिस्त, शाळेतील स्वच्छता याविषयी कौतूक करुन शिक्षिकांनाही धन्यवाद दिले. शिवाय शाळेला १ लाख रुपये देण्याची घोषणाही केली. यानंतर त्यांनी गावातील पीक पद्धती, पिकाची स्थिती, मुलभूत सुविधा याबाबत माहिती घेऊन गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. गावकऱ्यांनी पीक विमा, पूरपीडित शेतीचे चुकीचे पंचनामे यासंदर्भात अवगत केल्यानंतर आ.पाटील यांनी याबाबत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठविण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी शेकापचे मुंबई कार्यालयीन चिटणीस अॅड.राजेंद्र कोरडे, जिल्हा चिटणीस रामदास जराते, शेकापचे काटली येथील कार्यकर्ते देवेंद्र भोयर, रेवनाथ मेश्राम, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष रमेश उंदिरवाडे, वामन साखरे, निवृत्त तहसीलदार खंडारे, प्रभाकर डोईजड, परशुराम मुनघाटे, नरेश कोहपरे, श्रीकांत मुनघाटे, कैलास शिंपी, मुख्याध्यापिका आकरे, शिक्षिका व गावकरी उपस्थित होते.
काटलीच्या कार्यक्रमानंतर आ.जयंत पाटील यांनी गडचिरोलीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी काटली येथील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा उहापोह करुन त्यांचे कौतूक केले.