शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

काँग्रेसच्या महारॅलीत गडचिरोलीतून शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार: जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे

Thursday, 1st September 2022 05:48:55 AM

गडचिरोली,ता.१: देशभरातील जनता महागाईमुळे त्रस्त झाली आहे. या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे येत्या ४ सप्टेंबरला दिल्ली येथे महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत गडचिरोली जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

ब्राम्हणवाडे म्हणाले की, मोदी सरकारच्या ८ वर्षांच्या कार्यकाळात महागाई प्रचंड वाढली आहे. महागाईमुळे शेतकरी, मजूर, कर्मचारी आणि एकूणच सर्व स्तरातील नागरिक होरपळून निघत आहेत. परंतु सरकारला चिंता नाही. राज्यातही ईडीचे सरकार आहे. दोन्ही सरकार सर्वसामान्य जनतेसाठी काहीही करताना दिसत नाही. याविरोधात काँग्रेसने नेहमीच आवाज उठविला आहे. आता ४ सप्टेंबरला पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील महारॅलीत देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते महागाईविरोधात आपला आवाज बुलंद करणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनीही या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन ब्राम्हणवाडे यांनी केले.

पत्रकार परिषदेला माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, जिल्हा प्रभारी डॉ.नामदेव किरसान, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, डॉ.नितीन कोडवते उपस्थित होते.

६ सप्टेंबरला गडचिरोलीत मुंडन आंदोलन

अलीकडेच जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर आल्याने हजारो शेतकऱ्यांचे धानपीक नष्ट झाले आहे. शिवाय वित्तहानीही झाली आहे. परंतु प्रशासनाने अद्याप पंचनामे केले नाही आणि सरकारने त्यांना कवडीचीही मदत केली नाही. या विरोधात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शेतकऱ्यांसह ६ सप्टेंबरला गडचिरोलीत मुंडन आंदोलन करणार असल्याची माहिती महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिली

महागाई वाढीचा दर प्रचंड: डॉ.नामदेव उसेंडी

काँग्रेस सरकारच्या ६० वर्षांच्या काळात घरगुती गॅस सिलिंडर ४०० ते ४५० रुपयांपर्यंत उपलब्ध होत होता. परंतु मोदी सरकारच्या काळात सिलिंडरने ११०० रुपये ओलांडले आहेत. याचा अर्थ दीडशे पटींनी भाव वाढले आहेत. खाद्यतेल आणि अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत. याविरोधात महारॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी सांगितले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UL5RG
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना