गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

गडचिरोली: पाऊस थांबला; पण पूर वाढला, आरमोरीनजीकच्या वैनगंगेच्या पुलावर पाणी

Tuesday, 16th August 2022 07:33:08 AM

गडचिरोली,ता.१६: जिल्ह्यात आज सकाळपासून पाऊस थांबला असला; तरी मागील दोन दिवस संततधार पाऊस कोसळल्याने आणि गोसेखुर्द धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात येत असल्याने नदी, नाल्यांना पूर आला असून, तब्बल १९ मार्गांवरील वाहतूक कालपासून बंद आहे. पुरामुळे भामरागड येथील २३०, देसाईगंज येथील ४६, सावंगी येथील ३७ आणि वघाळा येथील ३५ अशा एकूण ४३१ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून ६ लाख ५ हजार ४७५ क्यूसेक्स, तर तेलंगणातील मेडिगड्डा धरणाच्या ८५ दरवाजांमधून ८ लाख ३५ हजार ७९० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता आणि इंद्रावती नद्यांची पाणी पातळी धोका पातळीच्या वर पोहचली आहे. आरमोरीनजीकच्या वैनगंगा नदीच्या पुलावरुनही पाणी वाहू लागले आहे.

पुरामुळे गडचिरोली-आरमोरी,गडचिरोली-चामोर्शी, आलापल्ली-भामरागड, देसाईगंज-लाखांदूर, आष्टी-गोंडपिपरी, सिरोंचा-कालेश्वरम या प्रमुख मार्गांसह कोरची-भिमपूर-बोटेकसा, कोरची-मसेली-बेतकाठी, कुरखेडा-वैरागड, वैरागड-पातलवाडा, लाहेरी-बिनामुंडा, अहेरी-लंकाचेन, अहेरी-वट्रा, अहेरी-देवलमरी इत्यादी मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. गोसेखुर्द धरणातून होणारा विसर्ग आज वाढविण्यात आला आहे. त्यामुळे धरणातील पाणी गडचिरोली जिल्ह्यापर्यंत पोहचण्यास आणखी वेळ लागणार असून, पूरस्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RD01B
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना