गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२९: जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी आणि भामरागड तालुक्याला अतिवृ्ष्टी आणि पुराचा प्रचंड फटका बसूनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तेथे गेले नाही. त्यांनी गडचिरोलीत येऊन पूर नसलेल्या भागातील वैनगंगा नदीला भेट देऊन पर्यटन केलं, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
नाना पटोले हे आज पूरस्थितीची पाहणी करण्याकरिता गडचिरोलीत आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. अतिवृष्टी आणि तेलंगणातील मेडिगड्डा प्रकल्पाचे पाणी सोडल्याने एकट्या सिरोंचा तालुक्यातील २५ गावं पाण्याखाली बुडाली. अजूनही काही गावांतील नागरिक राष्ट्रीय महामार्गावर राहुट्या बांधून जगत आहेत. ते पुराच्या भीतीने आपल्या गावात जायला तयार नाहीत. आ.विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसच्या समितीने सिरोंचा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करुन आपद्ग्रस्तांना मदत केली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथे भेट न देता वैनगंगा नदीला भेट देऊन पर्यटन केलं, असे पटोले म्हणाले. अजूनही पूरग्रस्तांचा पंचनामा झालेला नाही. त्यांना सरकारनं मदतही दिली नाही. हे सरकार आंधळं आणि मुक्यांचं आहे, अशी टीका करुन नाना पटोले यांनी पूरग्रस्तांना सरकारने हेक्टरी ७५ हजारांची मदत करावी, अशी मागणी केली. सध्याचं सरकार असंवैधानिक आहे. ते लोकशाहीला न मानणारे आहे. भाजपला आरक्षणमुक्त भारत करावयाचा आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
नियम धाब्यावर बसवून आधीच्या फडणवीस सरकारनं मेडिगड्डा प्रकल्पाला नाहरकत दिली. त्यामुळे पूरस्थिती ओढवली. भाजप सरकारने नेहमीच गडचिरोली जिल्ह्यावर अन्याय केला आहे. काँग्रेस त्याचा हिशोब मागेल, असा इशाराही पटोले यांनी दिला.
पत्रकार परिषदेला माजी मंत्री, आ.विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, जिल्हा निरीक्षक डॉ.नामदेव किरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार उपस्थित होते.