गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१४: आज भल्या सकाळी शेतावर गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करुन त्यास ठार केल्याची घटना आरमोरी शहरानजीक घडली. नंदू गोपाळा मेश्राम(५०)रा.आरमोरी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आरमोरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात नागरिक ठार होण्याची चोवीस तासांतील ही दुसरी घटना आहे.
नंदू गोपाळा मेश्राम हे आज सकाळी आरमोरी-देसाईगंज मार्गावरील नगर परिषदेच्या डंपींग यार्डसमोरील आपल्या शेतावर उन्हाळी धानपिकाची पाहणी करण्याकरिता गेले होते. शेतातून जात असताना दबा धरुन बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते जागीच गतप्राण झाले. घटनास्थळ हे आरमोरी शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला. कालच अरसोडा येथील एका महिलेला वाघाने ठार केले होते. त्यानंतर चोवीस तासांतील ही दुसरी घटना आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले असून, वाघाच्या बंदोबस्तासाठी वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार व काँग्रेसच्या आदिवासी आघाडीचे सचिव दिलीप घोडाम यांनी दिला आहे.