गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२६: दुर्गम भागातील नागरिकांनी लोकशाही मूल्ये आणि विकासाला अंगीकारले आहे. त्यामुळे दुर्गम भाग असतानाही अडचणींना तोंड देत विकासकामे होत आहेत. परिणामी गडचिरोली जिल्ह्याची परिस्थिती आता बदलत आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र यड्रावकर यांनी केले. ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज जिल्हा मुख्यालयाच्या पटांगणावर डॉ.यड्रावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जनतेला संदेश देताना ते बोलत होते.
नक्षली विचारधारा आता गडचिरोली जिल्हयातून हद्दपार होत आहे. वर्षभरात पोलिसांनी ४९ नक्षलवाद्यांना ठार केले. शिवाय जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागामार्फत दुर्गम भागात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जात आहेत, असेही ते म्हणाले. याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्यांचा राज्यमंत्री यड्रावकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शिवाय राष्ट्रपती पोलिस शौर्यपदक प्राप्त पोलिसांनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.