गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२: कोविड विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार होऊ नये यासाठी गडचिरोली जिल्ह्यात कडक उपाययोजना करण्यात येणार आहेत. मात्र, नागरिकांनी नियमित मास्क वापरावा आणि लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
मास्क वापरणे आणि लसीचे दोन्ही डोस घेणे ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. जे लोक मास्क वापरणार नाहीत, त्यांना पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल आणि हा दंड वसुलीचे अधिकारी शहरात नगर परिषद आणि नगरपंचायतींना, तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी मीणा यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सांगितले की, कोरोनाच्या ओमायक्रॉन या विषाणूच्या धर्तीवर शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना म्हणून यापुर्वी दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना रद्द करून नव्याने सुधारीत उपाययोजना नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना शारीरिक अंतर राखून गर्दी करु नये, गडचिरोली जिल्हयात ७६ टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला, तर ३८ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. दक्षिणेकडील सिरोंचा, अहेरी, भामरागड व एटापल्ली येथील लसीकरण बऱ्याच प्रमाणात व्हायचे आहे. त्या ठिकाणांसह जिल्ह्यात आरोग्य विभाग गावोगावी जावून लसीकरणाची व्यवस्था करीत आहे. परंतु या तालुक्यांतील नागरिकांसह लस न घेतलेल्या सर्वच ठिकाणच्या नागरिकांनी सामाजिक जबाबदारी म्हणून लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले.
श्री.मीणा यांनी जिल्ह्यात गरजेपेक्षा अधिक ऑक्सिजन निर्मिती होत असल्याची माहिती दिली. पत्रकार परिषदेला मुख्य कार्यपालन अधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते.