गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता़६
मागील सहा महिन्यांपासून भोजन पुरवठयाच्या देयकाची रक्कम न मिळाल्याने आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्याना आज(ता़६)उपाशी राहावे लागले़ कळा तीव्र झाल्यानंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी दुपारी एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयावर धडक देऊन नारेबाजी केली़
आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात विद्यार्थ्याची भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे़ मात्र, जिल्ह्यातील तिन्ही प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे़ अनेक आश्रमशाळांच्या गृहपालांचे पदे रिक्त आहेत़ सोबतच वसतिगृहांमध्ये वीज व शौचालयांचाही अभाव आहे़ शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर असतानाही विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली नाही़ आता विद्यार्थ्यांना भोजनाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे़ सद्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना कंत्राटदारांमार्फत भोजन दिले जात आहे़ परंतु मागील महिन्यापासून कंत्राटदारांना भोजनाच्या देयकांची रक्कम अदा न करण्यात आल्याने त्यांनी शनिवारपासून भोजन देणे बंद केले आहे़ देयकांची रक्कम मिळेपर्यंत भोजन देणार नाही, अशी भूमिका कंत्राटदारांनी घेतली आहे़ त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांवर उपाशी राहण्याची पाळी आली आहे़ यामुळे विद्यार्थ्यांनी आज गडचिरोली येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयावर धडक देऊन निदर्शने केली़ यावेळी एक विद्यार्थी भोवळ येऊन बेशुद्ध पडला़ यामुळे विद्यार्थी आणखी संतापले़ या सर्व बाबींसाठी प्रकल्प अधिकारी पी़ शिवशंकर जबाबदार असून, त्यांना तत्काळ हटविण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली़ या आंदोलनात आदिवासी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अनिल केरामी, प्रकाश मट्टामी, राकेश आत्राम, रविता नैताम, विकेश आत्राम, हेजल उईके, यशवंत मेश्राम, देवानंद सुरपाम, प्रवीण हलामी, रसुका दुगा, मुकेश नरोटे, अमर होळी, चक्रपाणी मडावी, दौलत धुर्वे, संदीप वरखडे यांच्यासह अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते़