गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२७: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर, शासनाने देशभरात संचारबंदी लागू केली आहे. अशाही परिस्थितीत काही बेजबाबदार नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांवर कारवाईचा बडगा उगारत पोलिसांनी ३२२ वाहनधारकांकडून सुमारे ८१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
संचारबंदीच्या काळात जनतेला जीवनावश्यक वस्तूंची अडचण भासू नये, यासाठी शासनाने जीवनावश्यक वस्तूंची सेवा देणाऱ्या केंद्रांना सूट दिली आहे. परंतु काही बेजबाबदार नागरिक विनाकारण बाहेर पडत आहेत. त्यांच्यावर वचक बसविण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करणे सुरु केले आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. केवळ हुल्लडबाजी करण्यासाठी कुणी बाहेर पडत असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे निर्देश पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आपल्या अधिनस्त पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.