गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२४ :जिल्ह्यात २० मार्चपासून परदेश, परराज्य व परजिल्ह्यातून आलेल्या सर्वच प्रवाशांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यात आजतागायत ५९५० प्रवाशांची नोंद करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वच नागरिकांना प्रशासन त्यांच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
जिल्हाधिकारी श्री.सिंगला यांनी आज व्हीसीद्वारे सर्व तालुक्यांचे तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कोरोनाविषयक माहिती जाणून घेतली. तसेच आवश्यक सूचनाही दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. विजय राठोड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोहित गर्ग उपस्थित होते.
जिल्ह्यात २० मार्चपासून परदेशातून, परराज्यातून, परजिल्ह्यातून आलेल्या सर्वच प्रवाशांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यात आज रोजीपर्यंत ५९५० प्रवाशांची नोंद करण्यात आलेली आहे. यात दररोल आकडेवारीत वाढ होत आहे. आता खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वच नागरिकांना प्रशासन त्यांच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
संचारबंदी लागू असतानाही विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची संख्या निदर्शनास येत आहे. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी तहसीलदारांना दिले आहेत. जगातील संसर्ग झालेल्या देशांमधील अनुभवांवरून फक्त आणि फक्त नागरीकच ही संसर्ग साखळी तोडू शकतात हा अनुभव आहे. या प्रक्रियेत कोणी अडचण निर्माण करून संसर्गास चालना देत असेल तर त्यासाठी प्रशासन जनतेच्या हितासाठी कठोर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले. गावस्तरावर पोलीस पाटिल तसेच ग्राम पाटील यांची मदतही घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना, पोलिसांचे आदेश व आरोग्य विभागाची माहिती आत्मसात करावी, करोना संसर्ग होऊ नये म्हणून कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवून कोणत्याही स्थितीत चुकीचे उपचार घेऊ नका, आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
करोना बाधित प्रदेशातून आलेल्यांना जिल्हयात घरीच क्वारंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पूर्ण १४ दिवस एकटयाने राहणे अवघड असले, तरी ते अनिवार्य आहे. या लोकांनी सूचनांचे पालन न केल्यास प्रशासन त्यांना शासकीय रूग्णालयात सक्तीने क्वारंटाईनमध्ये ठेवण्यासाठी कार्य करत आहे. सद्या परदेशातून आलेल्या १७ लोकांना घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. कालच्या उर्वरीत दोन लोकांचे नमुने आले असून तेही निगेटीव्ह आले आहेत.
कोणत्याही आरोग्यविषयक आपत्कालीन स्थितीत खासगी वाहतूकीला परवानगी आहे. मात्र त्यांच्या बरोबर दोन व्यक्तींना फिरण्यास परवानगी आहे. तसेच आवश्यक किराणा व इतर बाबी खरेदी करण्यासाठी चालक व त्याबरोबर एक व्यक्तीला सूट देण्यात आली आहे. मात्र प्रत्येक फिरणा-या नागरीकांनी फिरत असल्याबाबतचे कारण शासनाने सूट दिलेल्या कारणांपैकी असावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.