गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२२: राज्याच्या विधानसभेत एनपीआर, एनआरसीविरोधी ठराव घेऊन मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांवर विनंती मोर्चा काढला.
संपूर्ण राज्यात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सत्ताधारी महाविकास आघाडीतील कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, खासदार व जिल्हाध्यक्ष यांचे कार्यालय किंवा घरावर विनंती मोर्चे काढण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गडचिरोली शहरातही आज विनंती मोर्चा काढून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशासमोर अर्थव्यवस्थेचे गंभीर आव्हान उभे ठाकले असताना केंद्र सरकार सीएए, एनपीआर व एनआरसीसारखे संविधानविरोधी कायदे करून देशात अराजकता माजवण्याचे काम करत आहे. अशावेळी केरळ, पंजाबसह अनेक गैरभाजपा राज्य सरकारांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून सीएए, एनपीआर व एनआरसीविरोधात ठराव घेतले आहेत. परंतु महाराष्ट्रातील गैरभाजपा सरकारने अद्याप असा कोणताही ठराव पारित केलेला नाही. एनआरसीचे पहिले पाऊल म्हणून केंद्र सरकारने १ मेपासून एनपीआरची अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. यामुळे राज्य सरकारने सीएए, एनपीआर व एनआरसीविरोधात तत्काळ ठराव पारित न केल्यास राज्यातील ४० टक्के एस्सी, एसटी, ओबीसीसह मुस्लिम व अल्पसंख्याकांचे जीवन धोक्यात येणार आहे. त्यामुळे एनपीआरची अंमलबजावणी रोखायची असेल, तर विधानसभेत बहुमताने एनपीआर, एनआरसीविरोधी ठराव मांडून तो बहुमताने संमत करुन घ्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली.
मोटारसायकलने निघालेल्या या मोर्चाचे नेत्त्व भारिपचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजानन कुकूडकर, जिल्हा सल्लागार जी.के.बारसिंगे, महिला नेत्या माला भजगवळी, महासचिव योगेंद्र बांगरे, आयशा शेख, राजेंद्र बांबोळे, डॉ.योगेश नंदेश्वर, गुलाब मुगल, भोजराज रामटेके, अनिल निकुरे, सुधीर सोनटक्के, अनिल राऊत, सुनंदा देवतळे, ज्योती उराडे, डी.आर.जांभुळकर आदींनी केले.