गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१८: गडचिरोलीसारख्या मागास भागातील युवकांमध्ये स्वयंरोजगार व उद्यमशीलतेसंदर्भात जिज्ञासा व आवड निर्माण करण्यासाठी पत्रकारांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाच्या उद्योग स्नेही योजना व धोरणांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विकास संस्था नागपूरचे संचालक पी.एम. पार्लेवार यांनी केले.
केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत नागपूर येथील पत्र सूचना कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली यांच्या सहकार्याने आज हॉटेल वैभव येथे प्रसारमाध्यमांच्या वार्तालाप कार्यशाळेचे उद्घाटन श्री.पार्लेवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
नीती आयोगाने आकांक्षित जिल्हा म्हणून गडचिरोलीची निवड केली असून, कौशल्य विकास, उद्यमशीलता विकास यासोबतच सामायिक सुविधा केंद्र अशा केंद्रीय योजना उद्योग मंत्रालयातर्फे गडचिरोलीत राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री. पार्लेवार यानी यावेळी दिली. आरमोरी तालुक्यात तांदळाचे क्लस्टर तसेच गडचिरोलीच्या इतर भागात अगरबत्ती क्लस्टरसुद्धा निर्माण होत आहेत, असे त्यांनी सांगितले. एक यशस्वी उद्योजक म्हणूनसुद्धा युवकांनी करिअरकडे बघावे, असे आवाहन त्यांनी केले.
उद्घाटनीय सत्रानंतर झालेल्या पहिल्या तांत्रिक सत्रात ‘आदिवासी भागांमध्ये ग्रामीण उद्योगांचे महत्व’या विषयावर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सी. कोहाडे यांनी मार्गदर्शन केले. खादी ग्रामोद्योग आणि ‘मेक इन गडचिरोली’ या उपक्रमांतर्गत सुमारे तीनशे महिलांनी अगरबत्ती क्लस्टरसाठी आपल्या कार्यालयात अर्ज केला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
गडचिरोलीत आयुर्वेदिक औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. या वनस्पतीवर प्रक्रिया करून त्यांचे वैद्यकीय व इतर क्षेत्रात क्लस्टर निर्माण करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील युवकांनी पुढाकार घ्यावा, असे मत गडचिरोली जिल्ह्यातील अश्याच प्रकारच्या एक हर्बल उत्पादनाच्या क्लस्टरचे विकास संयोजक गणेश ठावरे यांनी यावेळी दिली.
प्रसारमाध्यमांनी समाज जीवनात घडणाऱ्या सकल घटना समाजापुढे मांडताना घटनेच्या दोन्ही बाजू मांडून समाजमत घडविण्यात भूमिका बजवावी, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार हेमंत डोर्लीकर यांनी ‘ग्रामीण क्षेत्रात प्रभावी जनसंवादासाठी वृत्तपत्र व समाज माध्यमांची भूमिका ‘ या विषयावर केले.
शासकीय योजना केंद्र व राज्य स्तरावर तयार होतात. त्याची योग्यरित्या होणारी अंमलबजावणी, संभाव्य उणिवा यासंदर्भात पत्रकारांनी पाठपुरावा केल्याने अशा योजनाचा प्रतिसाद कळतो. शासकीय योजनेच्या लाभार्थींच्या यशोगाथा प्रसिद्ध केल्यास इतरानांही त्याची प्रेरणा मिळते, असे मत ‘विकास संवादात प्रत्रकारांची भूमिका’ या विषयावर बोलतांना ज्येष्ठ पत्रकार मनोज ताजने यांनी यावेळी मांडले.
नागपूर आकाशवाणी वृत्त विभागाचे सहायक संचालक डॉ. मनोज सोनोने यांनी ‘ग्रामीण क्षेत्रात प्रभावी जनसंवादासाठी इलेक्ट्रोनिक माध्यमांची भूमिका’ यासंदर्भात मार्गदर्शन करताना शासकीय यंत्रणा आणि प्रसारमाध्यम यात परस्पर प्रतिसाद संकलन झाल्यास लोकांना न्याय मिळू शकतो असे सांगितले.
शेवटच्या तांत्रिक सत्रात पत्र सूचना कार्यालय, नागपूरचे सहायक संचालक शशिन् राय यांनी ‘विकास-संवाद आणि पत्र सूचना कार्यालय’या विषयावर सादरीकरण केले. कार्यशाळेला गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.