गडचिरोली | --°C | --°C |
कुरखेडा,ता.१४: तालुक्यातील गेवर्धा येथे शेतातील बोअर पंपामुळे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अवैधरित्या बोअर करून भूगर्भातून पाण्याचा उपसा करण्यावर प्रतिबंध लावण्याची मागणी गेवर्धवासीयांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे
गेवर्धा येथे गावालगत असलेल्या शेतशिवारात ५० ते १०० मीटर अंतरावर अनेक शेतकऱ्यांनी बोअर करून मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. धान पिकाकरिता भरपूर पाण्याची आवश्यकता असल्याने मोठया प्रमाणात बोअरच्या माध्यमातून भूगर्भातून पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, घरगुती विहिरी, तसेच हातपंप या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत्रांवर विपरित परिणाम झाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरी कोरड्या पडल्या आहेत. अजून उन्हाळ्याचे जवळपास चार महिने शिल्लक आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांवर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले असून, उन्हाळ्यात पाण्याविना जीवन जगणे कठीण होणार आहे
गेवर्धा येथील पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन गावालगत असलेले अनधिकृत बोअर तत्काळ बंद करावे, अशी मागणी गेवर्धावासीयांनी केली आहे