गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१२: तेलंगणा राज्यातील मेडिगड्डा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाच्या बॅक वाटरमुळे सिरोंचा तालुक्यातील रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कांकडालवार यांच्या नेतृत्वात आदिवासी विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. कुळमेथे यांना निवेदन देऊन पीक नुकसानीबाबत चर्चा केली. सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली गावाजवळ गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारकडून मेडीगड्डा-कालेश्वर सिंचन प्रकल्प बांधण्यात आला आहे. परंतु सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता मेडीगड्डा प्रकल्पाचे दरवाजे बंद केल्याने प्रकल्पाचे पाणी नदीकाठावरील शेकडो हेक्टर शेतजमिनीत शिरले. यामुळे मिरची, कापूस, धान, मका आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय १० फेब्रुवारीच्या रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे सिरोंचासह ग्रामीण भागातील संपूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची त्वरित पाहणी करून तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. भरपाई न मिळाल्यास आदिवासी विद्यार्थी संघ तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा अजय कंकडालवार यांच्यासह आविसं पदाधिकाऱ्यांनी दिला. शिष्टमंडळात आविसंचे सरसेनापती नंदू नरोटे, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव कुणाल पेंदोरकर, आविसंचे सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, आविसं सल्लागार रवी सल्लम, साई मंदा यांचा समावेश होता.